‘बॉईज’ सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या ‘बॉईज २’ मध्येदेखील बॉईजची तीच धम्मालमस्ती अनुभवता येणार आहे.
मात्र, या सिनेमाची गोष्ट एका घटनेने सुचली असल्याचे विशाल देवरुखकर सांगतात. ‘बॉईज’ च्या सिक्वलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडणदेखील गरजेचं होतं, त्यासाठी तोडीस तोड अश्या विषयाच्या शोधात मी आणि ऋषिकेश कोळी होतो. परंतु, चार-पाच महिने होऊनदेखील आम्हाला काहीच सुचत नव्हत. मात्र, एकदा अचानक माझा फोन बंद झाला, आणि त्यातूनच ‘बॉईज २’ ची गोष्ट आम्हाला सापडली’, असे विशाल देवरुखकर यांनी सांगितले.
अवघ्या दोन तीन तासासाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर विशाल यांची इतकी अवस्था वाईट होऊ शकते, तर कॉलेजतरुणासाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल? असा प्रश्न विशाल यांना पडला. त्यांनी लागलीच हा विचार ऋषीकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशनेदेखील त्याला पसंती देत ‘बॉईज २’ चे लिखाण सुरु केले. अश्या या अनावधाने सुचलेल्या ‘बॉईज २’ चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या ‘बॉईज’ ची धम्माल पाहायला मिळणार आहे.
किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहेत.
Leave a Reply